ताजे अपडेट

गॅस्ट्रो-डायरियाच्या संकटात रुग्णांना मिळाला मायेचा आधार; अ‍ॅड. माधुरी पवार धावल्या मदतीला

घाटबोरी, प्रतिनिधी

गॅस्ट्रो-डायरियाच्या संकटात रुग्णांना मिळाला मायेचा आधार; अ‍ॅड. माधुरी पवार धावल्या मदतीला

मेहकर तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल नागेशवाडी गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो व डायरियाची साथ पसरल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच, सर्वसामान्यांच्या दुःखात नेहमीच धावून जाणाऱ्या आणि अनाथ-निराधारांसाठी आधारवड ठरलेल्या अ‍ॅड. माधुरी देवानंद पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट शासकीय रुग्णालय गाठले.
एखाद्या लेकीला आपल्या घरातील व्यक्ती आजारी असल्याची वार्ता समजताच ज्या आर्ततेने ती धावत जाते, त्याच मायेने आणि आत्मीयतेने
अ‍ॅड. माधुरी देवानंद पवार रुग्णांच्या भेटीसाठी पोहोचल्या. रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाजवळ त्या प्रेमाने बसल्या, त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली, वेदना समजून घेत धीर दिला आणि “तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण केला. गोरगरीब, आदिवासी, निराधार आणि वंचित समाजातील नागरिकांविषयी असलेली त्यांची संवेदनशीलता त्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यांतून स्पष्ट जाणवत होती. अनेक रुग्णांचे नातेवाईक अडचणीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ जेवणाची व्यवस्था करून दिली. रुग्णांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनाही मानसिक आधार देत त्यांनी मानुसकीचे जिवंत दर्शन घडवले.
यावेळी त्यांनी संबंधित डॉक्टरांशी संवाद साधत स्पष्ट शब्दांत सांगितले, “हे नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत. त्यांच्या उपचारात कोणतीही हलगर्जीपणा होता कामा नये. आवश्यक औषधे, उपचार किंवा इतर मदतीची गरज भासल्यास मला तात्काळ कळवा. प्रत्येक रुग्णाला योग्य आणि वेळेवर उपचार मिळालेच पाहिजेत.”
अ‍ॅड. माधुरी देवानंद पवार यांच्या या सेवाभावी आणि संवेदनशील भूमिकेमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला. केवळ आश्वासनांपुरती समाजसेवा न ठेवता, संकटकाळात प्रत्यक्ष रुग्णालयात धाव घेऊन मायेचा हात देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कार्यामुळे अनेकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले, तर सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्या विषयीचा आदर अधिकच दृढ झाला. आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या युगात दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचे दुःख शोधणारी माणसं विरळाच आढळतात. मात्र
अ‍ॅड. माधुरी देवानंद पवार यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले की, समाजसेवा ही केवळ भाषणांत नसते; ती माणसांच्या वेदनांशी नातं जोडण्यात असते. संकटाच्या काळात आधाराचा हात देणारी, निराधारांना मायेची ऊब देणारी आणि गोरगरीबांच्या अश्रूंना संवेदनशीलतेने पुसणारी ही लेक आज अनेकांसाठी आशेचा, विश्वासाचा आणि माणुसकीचा जिवंत चेहरा ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका