माध्यमविश्व

अश्रूंच्या धारा… दु:खाच्या सावल्यांत उमलले हळदीकुंकवाचे रंग; अ‍ॅड. माधुरी पवार

घाटबोरी, प्रतिनिधी

 

अश्रूंच्या धारा… दु:खाच्या सावल्यांत उमलले हळदीकुंकवाचे रंग; अ‍ॅड. माधुरी पवार

मेहकर तालुक्यातील अ‍ॅड. माधुरी देवानंद पवार या कर्तृत्ववान कुमारी मुलीने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रमातून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या समाजसेवेचा सुगंधी ठसा उमटविला आहे. त्यासोबतच पुन्हा माधुरीने जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करून समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला. “मीसुद्धा एक स्त्री आहे, माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीने स्वतंत्रपणे जगता आले पाहिजे”, या भावनेतून माधुरी पवार यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून इतिहासाच्या सुवर्णपानावर नाव कोरले. गेल्या वर्षी जानेफळ नगरीत शांत दुपारी, त्या छोट्याशा प्रांगणात जणू वर्षानुवर्षांच्या सावल्या गोळा झाल्या होत्या. तिथे येणारी प्रत्येक स्त्री आपल्या पावलांत कितीतरी न बोलेले दुःख, कितीतरी न झिजलेल्या आठवणी आणि समाजाच्या रुढींचं ओझं घेऊन आली होती. समाजाच्या जुनाट रूढींनी वर्षानुवर्षे विधवा महिलांना दु:खात ढकलले होते. विधवा झालेल्या स्त्रीच्या कपाळावरची कुंकवाची साधी रेषासुद्धा समाजाने पुसली होती; पण तिच्यासोबतच तिच्या आयुष्यातील रंग, तिचं हास्य, तिचा स्वाभिमान, सगळंच कोणी तरी पुसून टाकलं होतं. तिच्या हास्यावरचा उजेड तिला गमवावा लागला आणि तिच्या आयुष्यातील सण-उत्सव समाजाने जणू गाडून टाकले. पतीच्या निधनानंतर घरच्या जबाबदाऱ्या, मुलांची काळजी आणि समाजाचा वंचित दृष्टिकोन त्यांच्या आयुष्यात खोल छाया टाकत होता. अशा अंधुक वाटणाऱ्या जीवनात त्या दिवशी मात्र आशेचा छोटासा दिवा पेटला, आणि तो पेटवणाऱ्या होत्या मेहकर तालुक्यातील जानेफळ जि.प. सर्कलमधील निराधारांची सावली—आशेचा दीपस्तंभ म्हणून ओळख असलेल्या अ‍ॅड. माधुरी देवानंद पवार. त्यांनी गेल्या वर्षी एक अनोखा उपक्रम राबविला. हा केवळ हळदीकुंकवाचा कार्यक्रम नव्हता; हा होता डोळ्यांत थांबलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचा सोहळा, अन्यायाने बंदिस्त केलेल्या आनंदाच्या दारांना उघडण्याचा क्षण, आणि दीर्घकाळ दाबून ठेवलेल्या स्वाभिमानाला पुन्हा शब्द देण्याचा प्रयत्न. विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ. ज्याने त्यांच्या आयुष्यातील धुक्याच्या सावल्यांमध्ये आशेचे रंग फुलवले. हा होता स्त्रियांच्या जखमी मनाला आधार देण्याचा, वर्षानुवर्षांच्या वेदनेला मलम लावण्याचा, आणि समाजातील रूढी-परंपरांना आव्हान देत स्त्रीच्या स्वाभिमानाची पुनर्स्थापना करण्याचा उपक्रम. समारंभात सहभागी झालेल्या महिलांच्या चेहऱ्यांवर सुरुवातीला आश्चर्य आणि संकोच दिसत होता. अनेक वर्षांपासून सण-उत्सवांपासून दूर राहिलेल्या या महिलांसाठी हा अनुभव फक्त सोहळा नव्हता; तर मनाची मुक्तता होती. एक वृद्ध महिला भावूक होत म्हणाली, “२२ वर्षांनी माझ्या कपाळावर कुंकू लावलं गेलं. आज मला वाटतं की मी पुन्हा जिवंत आहे. अनेक महिला अश्रू सावरत होत्या; काहींच्या डोळ्यांतून हळूहळू आशेची चमक उगवत होती. त्यांच्या डोळ्यातील त्या भावना सांगत होत्या की समाजाने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घातलेल्या बंधनांनी त्यांचे आयुष्य किती थकवले आहे. अ‍ॅड. माधुरी पवार यांनी त्यांच्या भावनांना समजून घेत सामाजिक स्वीकाराचा संदेश दिला, जो या उपक्रमाचा मूळ उद्देश होता. या सोहळ्यात हळदीकुंकू लावण्याच्या साध्या परंपरेतही एक मोठा संदेश दडलेला होता: विधवा असणे दोष नाही; तिच्या आनंदावर बंदी घालणे अन्याय आहे. पतीच्या निधनानंतरही स्त्रीला जीवनात सहभाग, स्वाभिमान आणि सन्मान मिळावा—हीच खरी मानवता. अ‍ॅड. माधुरी पवार म्हणाल्या, “स्त्रीचे आयुष्य तिच्या पतीच्या उपस्थितीवर अवलंबून नसावे. तिला आनंद घेण्याचा, रंगीत कपडे घालण्याचा, हसण्याचा अधिकार आहे. या उपक्रमाने स्त्रियांच्या हृदयात फक्त रंगच भरले नाहीत, तर त्यांच्या मनातील भीती आणि दु:ख दूर करून आशेची नवी किरणे प्रज्वलित केली. समारंभानंतर अनेक महिलांनी सांगितले की त्या पुन्हा सण साजरे करण्यास, समाजात सहभाग घेण्यास आणि स्वतःसाठी जगण्यास तयार आहेत. एका महिलेनं सांगितलं, माझ्या आयुष्यातला पहिला क्षण आहे जेव्हा मला अपराधी वाटले नाही; आज मला माझा सन्मान मिळाला. हा उपक्रम फक्त एका सोहळ्यापुरता मर्यादित नाही. अ‍ॅड. माधुरी पवार यांच्या पुढाकाराने मेहकरमध्ये विधवा महिलांसाठी नवी चळवळ सुरू झाली आहे, ज्यामध्ये मानसिक आधार, सामाजिक मार्गदर्शन, कायदेशीर हक्कांची माहिती आणि रोजगार संधी यांचा समावेश आहे. अशा उपक्रमांमुळेच समाजातील रूढी-परंपरांना पुन्हा विचार करण्यास भाग पाडले जाते आणि त्या महिलांना फक्त ‘विधवा’ नव्हे, तर सक्षम, स्वाभिमानी स्त्री म्हणून सामावून घेतले जाते. मेहकरमधील हा हळदीकुंकू सोहळा दाखवतो की जेव्हा अश्रूंना आधार दिला जातो, तेव्हा दु:खाच्या सावल्यांमध्येही आयुष्य फुलू शकते, आणि सामाजिक बदलाच्या पहिल्या किरणांची उगम होऊ शकते.

बदलाची सुरुवात स्वतःपासून करा.

आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा गोडवा, मकर संक्रांतीला अनेक महिला हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. अशा कार्यक्रमात विधवा महिलांना कुठेही आमंत्रण दिले जात नाही. पण आज माझ्या मैत्रिणींनी जुन्या परंपरेला छेद देत मला हळदी-कुंकवाचा मान दिला. आज मी माझ्या मैत्रिणींच्या मदतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून आनंदात संक्रांत साजरी केली. पती निधनानंतर अनेक महिला संक्रांतीचा सण साजरा करत नाहीत, पण बदलाची सुरुवात म्हणून मी स्वतःपासून केली. आज मी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात कुंकवापलीकडची संक्रांत साजरी करून आयुष्यात आनंदाचा गोडवा निर्माण केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका